पुणे -करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी आहे. मात्र तरीही पुणे शहरासह जिल्ह्यातील गावागावातील गल्ली, बोळात भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणत एकत्र येत गर्दी करत आहेत.
करोना रोगामुळे सपूर्ण जग होरपळत आहे. मात्र इकडे जनता भाजीवाल्याच्या मागे पळत आहे. त्यामुळे नागरिकांना कशाचेही गांभीर्य असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी अनेक नागरिक सकाळपासूनच भाजी खरेदी तसेच इतर विविध कामांसाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे एकीकडे शासनाकडून करोनाला रोखण्यासाठी उपाय केले जात असताना दुसरीकडे मात्र असंख्य नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
नागरिकांनी या संकटाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य, केंद्र शासन तसेच पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. त्यामुळे नागरिकांनी हा रोग आटोक्यात येईपर्यंत तरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतू राज्यभरात कोठेही याचे पालन करताना दिसून येत आहे. केवळ दुकानातच नाही तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे माल विकत घेण्यासाठी परिसरात झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बेजबाबदार नागरिक आणि विक्रेत्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
संचारबंदी लागू झाल्यानंतरही अनेक लोक अत्यावश्यक सेवा असणाऱ्या पुण्यात तसेच ग्रामीण भागात भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार संध्याकाळपर्यंत भाजी मंडई सुरु राहणार असल्याचे आवाहन केले जात आहे. मात्र नागरिक कोणतीही जीवाची पर्वा न करता गर्दी करत आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी प्रशासनानेही नागरिक ऐकत नसल्यास बेधडक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा या कृत्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत.राज्यातील मार्केट पुढील 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आजपासून बंद ठेवणार असल्याचे असोसिएशन आणि हमाल संघटनेनं सांगितल आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातही संचारबंदीच्या आदेशाचा नागरिकांकडून बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत नागरिक बिनधास्त रस्त्यावर उतरत आहेत.संचारबंदी लागू असूनही नागरिक अद्याप गंभीर नाहीत असे बोललं जात आहे. नागरिकांनी भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकार कडक पावलं उचलत आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिक बेजबाबदारपणे गर्दी करत हे सर्व पायदळी तुडवलं जात आहे.
संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला घ्यायला ग्राहकांनी गर्दी केली आहे. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी एका ठिकाणी बसून भाजीपाला विकण्याऐवजी फिरुन भाजीपाला विकावा असे आदेश प्रशासनातर्फे दिले जात आहे. मात्र प्रशासनाचे हे आदेश धाब्यावर बसवून भाजीपाला विकणाऱ्यांची आणि ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
स्वतःला सावरा अन्यथा ही वेळ येणारच
राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात कोणीही नागरिक विनाकारण फिरत आहेत. त्यांना पोलीस प्रशासन वेळोवेळी दंडुक्याचा प्रसाद देत आहेत. तरीही सामान्य जनता सुधारण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःला वेळीच सावरण्याची गरज आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा सद्या असलेली परिस्थिती, तसेच येणारा कोणताही रोगाला असेच बळी पडण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
राज्यातील जनतेने रविवारी जनता कर्फ्युचे चांगल्या पद्धतीने पालन केले परंतु सायंकाळी पाच वाजता त्याचे उपकार म्हणून नागरिकांनी रस्त्यावर येत गर्दी करून शासकीय, प्रशासनाचे आभार मानले. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात झाली आहे. अशा कृत्यामुळे सर्वांना याचा फटका बसणार आहे. भाजीपाला हा सर्वांना नेहमी मिळतच असतो. त्यासाठी सरकारने सतर्क होत दुकाने उघडे ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु नागरिक बेजबाबदारपणे का वागत आहेत हे प्रशासन, शासकीय यंत्रणेला न उलघडलेलं भयानक कोडं आहे.
– सचिन भोसले,
नागरिक, पुणे.