मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच जात आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे संकट राज्यावर आले आहे. आज नागपूर, वर्ध्यासह विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर विदर्भासह राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) शहर आणि तालुक्यातील परिसरात 18 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. पावसामुळे कारंजा इथल्या बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल भिजला. कारंजा परिसरात तसच तालुक्यातील काही भागात आज पहाटे जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळ काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
राज्यात 18-21 मार्च मध्ये मध्यम पाउस.
विजा, गारपीट शक्यता-IMD
Under influence of interaction between mid-level westerlies & lower level easterlies thunderstorm/hailstorm activity is likely over Madhya Maharashtra, Marathwada, Vidarbha (hailstorm) during 18-21Mar.
Watch updates pl pic.twitter.com/BTJQkCtnvH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 15, 2021
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.