वाघोली ( प्रतिनिधी) : पुणे-नगर महामार्गावर गाडीला कट मारल्याचा बहाणा करून साडे तेरा लाख रुपये चोरून पसार झालेल्या वाघोली परिसरातील टोळीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोघांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती तर इतर तिघांना नंतर अटक केली असून त्यांच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
इशाप्पा उर्फ विशाल जगनाथ पंदी (वय १९), प्रदिल उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय २३), ओंकार शंकर गुंजाळ (वय २४), गणेश रामदास काळे (वय ३२), विजय नंदू राठोड (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यातील फिर्यादी यांचा टेम्पो अडवून कट मारल्याचा बहाणा करीत साडे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत असताना ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून इशाप्पा पंदी यास केसनंद फाटा तर प्रदीप कोंढाळकर यास राहत्या घरातून अटक केली होती.
दोघेही पोलीस कोठडीत असताना आणखी तिघांची नावे समोर आली. त्याचदृष्टीने तिघे नवीन मोबाईलवरून संपर्क साधत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर ऋषिकेश टिळेकर व सचिन पवार यांनी सापळा रचून ओंकार गुंजाळ, गणेश काळे व विजय राठोड यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, पल्सर, रोख रक्कम व चोरीच्या पैशातून खरेदी केलेले कपडे, फ्रीज, मोबाईल फोन असा ७ लाख १४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.