-अमित डोंगरे
मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे हे जरी सांगितले जात असले तरीही त्याची सातत्यता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिसून न आल्यामुळे आता त्याच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
भारतीय संघातील एक तंत्रशुद्ध फलंदाज अशी रहाणेची ओळख आहे. काही सामन्यांत तर त्याने कर्णधार विराट कोहलीवरही मात करत संघाच्या विजयात मोलाचे वाटे उचलले आहेत. त्याच्या एकदिवसीय सामन्यांतील कामगिरीच्या जोरावरच त्याला आयपीएलमध्ये खेळवले गेले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सकडून त्याने सहभाग घेतला होता. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स व यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने आयपीएल स्पर्धा खेळली आहे.
रहाणे अपयशी ठरत असल्याचे प्रत्यक्ष सामन्यांतील कामगिरीवरून दिसून येत असले तरीही त्याची आकडेवारी काही वेगळेच सांगत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 4 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेतही त्याने सात सामने खेळले मात्र, त्याला केवळ एकच अर्धशतकी खेळी करण्यात यश आले. त्याला केवळ 15 ची सरासरी नोंदवताना केवळ 111 धावाच करता आल्या. त्याच्या यंदाच्या स्पर्धेत बाद होण्याच्या पद्धतीवर सातत्याने टीका होत आहे.
स्पर्धेच्या इतिहासात त्याने 147 सामने खेळताना 31 च्या सरासरीने 3931 धावा केल्या आहेत. आयपीएल कारकिर्दीत त्याने 2 शतके व 28 अर्धशतके फटकावलेली आहेत. त्याची राजस्थान रॉयल्सकडून केलेली कामगिरी सर्वात सरस आहे. मात्र, तरीही त्याला यंदा संघाच्या करारातून मुक्त केले गेले व त्याला दिल्ली संघाने आपल्याकडे घेतले. मात्र, संघाच्या एकाही विजयात त्याने वाटा उचलला असे त्याची कामगिरी पाहून म्हणावेसे वाटते. 2012, 2013, 2015 व 2016 ही चार वर्षे त्याने या स्पर्धेत अत्यंत सरस कामगिरी केली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्याला खेळायला मिळालेल्या केवळ सात सामन्यांत त्याला फारसे यश मिळाले नाही.
तंत्रशुद्ध फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये अपयशी ठरतात हेच रहाणेच्या कामगिरीवरून सिद्ध होत आहे. हिट आऊट गेट आऊट या संकल्पनेवर आधारित हे क्रिकेट जसे व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा अशा तंत्रशुद्ध खेळाडूंना मानवले नाही तीच अवस्था रहाणेची झाली आहे. वरील तीनही खेळाडूंवर जसा कसोटी फलंदाज असा शिक्का बसला तोच येत्या काळात रहाणेवरही बसणार असून पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला आता दिल्ली संघ मुक्त करेल अशीच शक्यता जास्त आहे. मात्र, खरे संकट पुढेच आहे.
दिल्लीने त्याला मुक्त केले तर त्याची यंदाची कामगिरी पाहून कोणताच संघ त्याला आपल्याकडे घेण्याचा धोका पत्करणार नाही. रहाणे आता 32 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील काळात युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचे धोरण स्पर्धेतील सर्व संघ स्वीकारतील अशीच अपेक्षा आहे. त्याला कारणही तसेच आहे. यंदाच्या स्पर्धेत जागतिक क्रिकेटमध्ये जे स्टार फलंदाज म्हणून गणले जात होते त्यांना फारसे यश मिळाल्याचे दिसत नसल्याने यंग ब्रिगेडकडे सर्व संघ लक्ष देतील. असे झाले तर जे पुजाराबाबत घडले तेच रहाणेबाबतही घडलेले पाहायला मिळेल.
गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर तंत्रशुद्ध पण अपयशी असाच शिक्का रहाणेवर बसलेला आहे. यातून बाहेर येण्यासाठी जरी त्याने सज्जता केली तरीही ती सिद्ध करण्यासाठी त्याला अन्य कोणत्या संघाने घेतले पाहिजे किंवा दिल्ली संघानेच राखले पाहिजे. सध्या तरी चित्र रहाणेसाठी फारसे आशादायी वाटत नाही. तरीही त्याला दिल्लीने राखले किंवा अन्य कोणी आपल्या संघात घेतले तर ती लॉटरी लागली असेच म्हणावे लागेल. मात्र, त्याला अपयशी असा शिक्का पुसण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल हे निश्चित.