राहुल द्रविड हेच आगामी काही काळासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचे जाहीर झाले व इतके दिवस चाललेले कवित्व अखेर संपूष्टात आले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी-२० सामन्यांची मालिका संपली की द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाला जोडले जातील. मात्र, आता त्यांची सेकंड इनिंग केवळ मार्गदर्शकाची राहू नये तर पुढील वर्षी होत असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवत प्रयोगशीलतेची राहावी अशी अपेक्षा आहे.
सध्या नियमित कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली, लोकेश राहूल, महंमद शमी, महमद सिराज, कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती दिली गेली होती. ते संघात परततील अशी अपेक्षा आहे. मात्र, संघ निवड करताना द्रविड यांच्यासह निवड समितीनेही प्रयोग करायला काय हरकत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना संघात पुनरागमन करण्याची संधी द्यावी व एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत आत्ता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळत असलेलाच संघ कायम ठेवावा. त्याने दोन गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे नवोदितांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळेल व दोन म्हणजे पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड समितीकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील.
तसेही रोहित व कोहलीने मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी निवड समितीला ठोस काही कळवलेले नाही. कोहलीने विश्रांतीची मागणी केली आहे मात्र रोहितकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. मग निवड समितीनेही त्यांच्याशी चर्चा करत नव्या खेळाडूंनाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कायम ठेवले तर त्यांचीही परिक्षा घेता येणार आहे. मायदेशात खेळणे व परदेशात वेगळ्या वातावरणात खेळणे यातील फरक त्यांना समजेल व पुढील वर्षी अचानक संघात स्थान मिळाले तर वेस्ट इंडिज व अमेरिकेत घाबरगुंडी उडणार नाही.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ही वेस्ट इंडिज व अमेरिका हे दोन देश मिळून संयुक्तपणे आयोजित करत आहेत. तेव्हा जुलै महिना असेल व दोन्ही देशांतील वातावरण भारताच्या बरोबर उलटे असेल. जर नेहमी संघात प्रमुख खेळाडू खेळवूनच आपण मालिका जिंकायच्या असतील तर आमच्याकडे परिपूर्ण सेकंड बेंच आहे हे म्हणण्यालाही काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे केवळ द्रविड यांनीच नव्हे तर बीसीसीआय व निवड समितीनेही दक्षिण आफ्रिका तसेच त्यानंतरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये प्रयोग करावेत व रोटेशननूसार प्रत्येकाला पुरेशी संधी द्यावी हीच अपेक्षा आहे.