नवी दिल्ली – जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या या जीवघेण्या विळख्यातून जगाची सुटका करण्यासाठी असंख्य संशोधक अहोरात्र झटतायेत. मात्र कोरोनावर प्रभावी ठरेल असं औषध वा प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात अद्याप यश आलेलं नाहीये. अशातच काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनावरील औषध सादर केलं होत. मात्र त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या औषधाभोवती संशयाचे ढग दाटले आहेत.
दरम्यान, पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी आज याबाबत वक्तव्य करताना एक गोंधळात टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘आम्ही कोरोना उपचारांसाठी अथवा त्याचा फैलाव रोखण्यासाठी औषध तयार केल्याचा दावा कधीही केलेला नाही. मात्र आम्ही जी औषधं तयार केलीयेत त्यांच्या कोरोना रुग्णांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्या असता ही औषधं प्रभावी ठरल्याचं आढळलंय. यात गैरसमज करण्याचं कारण नाही.’
तत्पूर्वी, पतंजली संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमाद्वारे रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण यांनी आपण कोरोनावर प्रभावी औषध शोधून काढल्याचा दावा केला होता. या औषधाचे नामकरण कोरोनही असे करण्यात आले होते. या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेतल्या असता कोरोनाग्रस्त या औषधाच्या सेवनानंतर ३ ते ७ दिवसांच्या कालावधीत पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा देखील यावेळी करण्यात आला होता.
पतंजलीतर्फे कोरोनील सादर केल्याच्या अवघ्या काही तासांमध्येच आयुष मंत्रालयातर्फे या औषधाच्या पुढील चाचण्या होईपर्यंत जाहिरात न करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर औषधाची परवानगी घेताना पतंजलीतर्फे हे औषध कोरोनावर उपचारांसाठी वापरण्यात येईल याबाबतची माहिती न दिल्याचा गौप्यस्फोट एका अधिकाऱ्याने केला होता. तसेच याबाबत खुलासा करण्याचे नोटीसही पतंजलीला बजावण्यात आले होते.
आयुष मंत्रालयाच्या नोटीसीनंतर पतंजलीने काल आपण कोरोनावर औषध बनवले नसल्याचा निर्वाळा करण्यात आला होता.
We never told the medicine (coronil) can cure or control corona, we said that we had made medicines and used them in clinical controlled trial which cured corona patients. There is no confusion in it: Acharya Balkrishna, CEO Patanjali pic.twitter.com/LfPCxML0jg
— ANI (@ANI) June 30, 2020