नवी दिल्ली: अनलॉक झालं असलं तरी लॉकडाउनसारखी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. कोरोनाला हरविण्यासाठी आजही काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: कंटेनमेंट झोनमध्ये खूप लक्ष द्यावे लागेल. जे लोक नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना रोखायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान नियमांचे अत्यंत गंभीरपणे पालन करण्यात आले. आता तीच दक्षता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थां, देशातील नागरिकांना दाखविण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
एका देशाच्या पंतप्रधानांना १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला कारण ते मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेले होते. भारतातही स्थानिक प्रशासनाने या चपळाईने काम केले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांचे संरक्षण करण्याची ही मोहीम आहे. भारतात कोणीही सरपंच असो किंवा देशाचे पंतप्रधान नाही, कोणीही नियमांपेक्षा मोठे नाही, असे मोदींनी स्पष्ट केले.
देशात लॉकडाऊन टप्प्याच्या समाप्तीनंतर वाढती दुर्लक्ष्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, देशात अनलॉक -२ असल्याने वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनातही दुर्लक्ष वाढत आहे. सुरुवातीला, मास्कघा लण्यास, दोन फूट अंतर ठेवण्यासाठी, दिवसातून 20 सेकंद अनेक वेळा हात धुण्याविषयी खूप सावध होतो. आपण आजही त्याच सतर्कतेसह रहायला हवे.