संगमनेर – दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील आठही करोना रुग्ण बरे झाल्याने तालुका करोनामुक्त झाला असतांना आज तालुक्यातील धांदरफळमधील एका 68 वर्षीय करोना संशयिताचा मृत्यू झाला. या व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथेच त्याचा स्त्राव घेवून तो मुंबईला तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो अहवाल मुंबईहून आल्यानंतर तो करोनाबाधित असल्याचे आढळून आले. मात्र आरोग्य विभागाने त्या अहवालावर समाधान न मानता पुणे येथील प्रयोगशाळेत पुन्हा नमुना तपासणीसाठी पाठविला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील या व्यक्तीला शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना संशय आला.
त्यामुळे त्यांनी याबाबत ग्रामीण रुग्णालयाला सूचना दिली.त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने त्या व्यक्तीचा स्त्राव घेवून तो तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवला. दरम्यान, या संशयिताच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल न करता घरी नेल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे, तर त्या रुग्णावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते अशी चर्चा धांदरफळात सुरु आहे. या संपूर्ण गोंधळात आज सकाळी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे हादरलेल्या प्रशासनाने वैद्यकीय प्रयोगशाळेशी संपर्क करुन तातडीने अहवाल देण्याची विनंती केली असता मृत्यू पावलेल्या व्यक्ती करोनाबाधित असल्याचे मुंबईच्या अहवालात म्हटले आहे.
मात्र त्यावर समाधान व्यक्त न करता आरोग्य विभागाने पुण्याकडे स्त्राव तपासणीसाठी पाठविला आहे. दरम्यान, या व्यक्तीचा अहवाल मिळण्यापूर्वी तो किती जणांच्या संपर्कात आला? ज्या खासगी रुग्णालयात त्याला दाखल केला होते, तेथील कोण कोण त्याच्या संपर्कात आले. याचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, त्या नामांकित खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.