नगर -करोनाबाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत एक हजार 648 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून, त्यापैकी एक हजार 557 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यातील 44 करोनाबाधितांपैकी 34 रुग्ण करोना मुक्त झाले असून, रुग्णांची करोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
दरम्यान, या रुग्णांवर उपचार करणाऱ्या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर करोना प्रतिबंधासाठी आहोरात्र राबणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले.
नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखविलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्री, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आभार मानले. आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि करोनाला दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 44 करोनाबाधित रुग्णांपैकी आता आठ रुग्ण उपचार घेत असून, दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुनयापैकी 16 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमनेर येथे चार नेपाळी व्यक्ती 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे 14 दिवसांनंतर स्त्राव नमुने घेतले असता ते पॉझिटीव आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सात दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जामखेड येथील करोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.