विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
लोणावळा – करोना महामारीची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार हे पूर्णतः अपयशी ठरले असून, आरोग्य व्यवस्थेच्या हेळसांडपणामुळे करोनाबाधितांचे मृत्यू झाले असून ते सर्व व्यवस्थेचे बळी आहेत, अशी टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर हे सध्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरे करत आहेत. या दरम्यान गुरुवारी दरेकर यांनी लोणावळा शहराला भेट देत येथील कोविड उपाययोजनांबाबत माहिती घेतली. या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी आघाडी सरकारला धारेवर धरले.
करोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सरकार गंभीर नसून गरिबांना खासगी दवाखान्यात 2 लाखापासून 15 लाखांपर्यंत भरमसाठ बिल येत आहे. एवढे बिल भरणे गरिबांना शक्य नाही. सरकारचे खासगी रुग्णालयांवर नियंत्रण नाही, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. सर्व खासगी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली आणावीत, तसेच सरकारी रुग्णालयांची यंत्रणा सशक्त करावी, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, आमदार रमेश पाटील, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवी पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
दरेकर म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी राज्यात फिरत असताना ज्या काही कमतरता जाणवल्या, त्याबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची तपशीलवार 14 पानी टिपण्णी शासनाकडे सुपूर्द केली आहे. तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. मात्र दुर्दैवाने आकसापोटी दोन दिवस होऊनही चर्चेसाठी वेळ दिली नाही.
राज्यसरकार अकार्यक्षम
बुधवारी पुण्यात एका शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला. यावर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून सुमारे 400 व्हेंटिलेटर राज्य शासनाला दिले आहेत. मात्र राज्य शासनाकडे हे व्हेंटिलेटर चालवण्यासाठी प्रशिक्षित माणसेच उपलब्ध नसल्याने ते सर्व व्हेंटिलेटर पडून असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमता आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. दरेकर यांनी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील या वेळी टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वतःच्या शहरातील हॉस्पिटलला असलेली कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द होते, तेथील 6 नर्सेसला करोनाची लागण होते, हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नसल्याचे सांगण्यात येते. ही अशी अवस्था या मोठ्या नेत्यांच्या शहरात असताना जिल्ह्यात आणि राज्यात काय करणार असा, प्रश्न उपस्थित करीत शितावरून भाताची परीक्षा होते, अशी उपरोधिक टोला ही दरेकर यांनी लगावला.
कॉंग्रेसमधील तरुण नेतृत्व अस्वस्थ
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत दरेकर यांना प्रश्न विचारला असता, दरेकर म्हणाले की, हा कॉंग्रेसचा अंतर्गत वादाचा मुद्दा असून, त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. मात्र कॉंग्रेसमधील तरुण नेतृत्व अस्वस्थ असून कॉंग्रेस पक्षात आजही क्षमता आणि गुणवत्तेपेक्षा गांधी घराण्याशी निष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते, असेही ते म्हणाले.