मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा तीन हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. बुधवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २ हजार ९१६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यभरात बुधवारी २३२ नवे रुग्ण आढळले असून मागील चोवीस तासांत ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून राज्यातील मृतांचा आकडा हा १८७ वर पोहचला आहे. बुधवारी पुण्यात सर्वाधिक ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईत २ आणि अकोल्यामध्ये एकाने कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
कोरोनामुळे राज्यात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने बारा हजाराचा टप्पा पार केला असून महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि प्रशासन कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
मुंबईतील धारावीतही एका ५५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्य झाला असून या परिसरात आतापर्यंत ८ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावी परिसरातील आकडा आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाने अनेक पावले उचलली आहेत. परिसर संपूर्णपणे सील करण्यात आला असून डॉक्टरांचे पथक घरोघऱी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे.