नवी दिल्ली : भारतात अद्याप सामुहिक संसर्ग झाला नसला तरी त्याच्या उंबरठ्यावर देश आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. निजामुद्दिन येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 200 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. तेंव्हा आपल्या एकत्रित प्रयत्नांनीच कोरोनावर मात करता येईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने आज पत्रकारांना देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. काही कागदपत्रांमध्ये सामुहिक संसर्ग असा शब्दप्रयोग हा मर्यादित अर्थाने वापरला गेला. मात्र त्यानंतर त्याचा विपर्यास केला गेला. देशात सामुहिक संसर्ग सध्या तरी झालेला नाही. सध्या आपण स्थानिक संसर्गाच्या पातळीवर आहोत. त्याचवेळी समाजाने आपल्याला सांभाळले पाहिले. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, रक्तदाबाचे रुग्ण, हृदयविकारचे रुग्ण, मुत्रपिंडाचे विकार असणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी आहेत अशा व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग सांभाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील मजुरांकडून या महिन्यात घरमालकांनी घरभाडे वसूल करू नयेत, तसेच त्यांना घराबाहेर काढू नये, असे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. राज्यातून स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांना ते असतील तेथेच त्यांना थांबवून त्यांच्या निवासाची आणि अन्न पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. जे मजूर कामावर असतील त्यांना काम बंद असेल तरीही पूर्ण महिन्याचे वेतन देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
सर्व प्रकारच्या धार्मिक समारंभावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात कोरोनाची रविावर अखेर 38 हजार 742 जणांची चाचणी करण्यात आली. देशात सरकारी 115 केंद्रांवर तर खासगी 47 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात आहे. खासगी केंद्रावर दररोज 420 ते 450च्या दरम्यान चाचणी होत असून तीन दिवसांत एक हजार 334 चाचनी झाल्याचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.
—————————————-
लक्षणं लपवू नका
कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने सरकारी यंत्रणांशी संपर्क साधा. सुरवातीच्या काळात उपचार झाला तर कोरोना बरा करणे सहज शक्य होते. मात्र, त्यास उशीर झाला तर गुंतागूंत होऊ शकते. वेळेत उपचार केलेल्या 99 जण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत ही लक्षणे लपवू नका असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
———————————————