मंचर-राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात येथून गेल्या अनेक वर्षांपासून मोलमजुरीसाठी आलेली कुटुंबे करोनाच्या धास्तीने माघारी पायी जाताना दिसत आहेत. वाहने नसल्याने पायी घरी जाण्याचा त्यांचा दृढ निश्चय रस्त्याने दिसत आहे. भोसरी, चाकण येथील कंपन्या बंद झाल्याने संबंधित परप्रांतिय कुटुंबीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांनी घरी जाणे पसंद केले आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या संचारबंदीमुळे घराबाहेर कुणीही फिरताना दिसत नाही.त्यामुळे शेतीची कामे ठप्प आहेत.शेती कामासाठी शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होत नाहीत. जे मजूर रोजंदारीवर जाऊन आपली उपजिविका भागवायचे.त्यांनाही शेतात जाऊन काम करण्याची भीती वाटत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी मजूर नाही. तर मजुरांना रोजगार नाही, अशा विचित्र अवस्था ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शेती नाही. अशा कुटुंबीयांच्या उपजिविकेची अडचण निर्माण झाली आहे. राजस्थान – चित्तोडगड येथील रामानंद शर्मा हे भोसरी येथील एमआयडीसी कंपनीत कुटुंबीयासह रोजंदारीवर कामाला होते.संचारबंदीमुळे कंपनी बंद झाल्याने उपासमारीची वेळ
आल्याने ते कुटुंबीयांसह बाराशे किलोमीटर पायी जाताना तसेच मध्यप्रदेश-सिंधिया येथे पाचशे किलोमीटर अंतर कापून घरी जाण्यासाठी रामसिंग चव्हाण हे कुटुंबीयांसह अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील पुणे – नाशिक रस्त्यावर काही सामाजिक संस्थांना दिसून आले.संबंधित संस्थांच्या सदस्यांनी त्यांना जेवणाची आणि पाण्याची सोय केली.