नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.
दरम्यान, करोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षितच आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचार्यांना जाणवलेली लक्षणे याच प्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज डॉ. म्हैसेकर यांनी करोनाविषयक उपचारांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. एस. दीपक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी, जिल्ह्यातील करोनाची सद्यस्थिती, उपचार घेणार्या रुग्णांची संख्या, बाधितांच्या प्रमाण व त्याची टक्केवारी तसेच जिल्ह्यात कोणत्या भागात सध्या करोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे, याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी त्यांना माहिती दिली.