झेंडू व इतर फुलांचे मळे डोळ्यादेखत नेस्तनाबूत होतानाची वेळ
करोनाच्या सावटाखाली पाडव्याचा गोडवा कमी
पुणे – साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यालादेखील करोनाचा फटका बसला आहे. यानिमित्त दूध डेअऱ्यांची उत्पादने बाजारातच येऊ न शकल्याने राज्यातील डेअऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. तर खास पाडव्याकरिता राखलेले झेंडू व इतर फुलांचे मळे डोळ्यादेखत नेस्तनाबूत होतानाची वेळ फुूल उत्पादकांवर आली आहे. त्यामुळे पाडव्याला होणारी मोठी उलाढाल थंडावल्याचे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळाले.
हिंदू नववर्ष असलेल्या पाडव्याचे मोठ्या दिमाखदारपणे साजरे करण्याचे प्रमाण आता वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून, फुले वाहत, पुरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवून हा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणाला घरोघरी पारंपरिक पद्धतीने पोळ्या बनवल्या जात असल्या तरीदेखील श्रीखंड, पनीर, बासुंदी, खवा या दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या केवळ दुधाची वाहतूक डेअऱ्यांकडून होत आहे. त्यातही डेअरीच्या वाहनांवर चालक म्हणून काम करणारे अनेकजण करोनाच्या भीतीने गावी गेले आहेत.
परिणामी अनेक नामांकित डेअऱ्यांची दूध वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्याच्या निमशहरी भागात पॅकबंद दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. करोनामुळे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होऊ न शकल्याने हे उपपदार्थ बाजारात येऊ शकलेले नाहीत. करोनामुळे नागरिकांकडूनही दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे चित्र होते. करोनाच्या सावटाखाली पाडव्याच्या गोडवा कमी झाला आहे. किराणा स्टोअर्स मध्ये उपलब्ध असलेले दुग्धजन्य पदार्थ साठा मर्यादित असल्याने तो संपला आहे.
पाडव्याच्या पूर्वसंध्येला गजबजून जाणारा बाजार “ओस’
जनता कर्फ्यू आणि आता संचारबंदीमुळे नागरिक भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहेत. तर पाडव्याच्या पूर्वसंध्येला गजबजून जाणारा बाजार आणि उत्साहात होणारी खरेदी आता कुठेही दिसत नाही. बाजारात अगदी तुरळक ठिकाणी आणि अभावानेच झेंडूची फुले दिसत आहेत. तर नागरिकदेखील पूजाअर्चेसाठी अगदी पावशेर – अर्धा किलो खरेदी करत आहेत. जिल्ह्याच्या खेड, मोशी, पुरंदर, सासवड या भागांतील फूल उत्पादकांनी खास पाडव्यासाठी राखलेले फुलांचे मळे तसेच सोडून दिले आहेत. ग्रामीण भागातही आता करोनावर लक्ष केंद्रित केल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या पाडवा सिझनवर फूल उत्पादकांना पाणी सोडावे लागले आहे.