मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून सक्रीय रुग्णांची संख्याही हजाराचा आत आहे. एकंदरीत राज्यात करोना संसर्ग आणि एकूणच परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.मागील काही दिवसात करोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मास्कची सक्तीची गरज नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राजेश टोपे म्हणाले, आम्ही सध्या ट्रेकिंग यंत्रणेवर अधिक जोर दिला आहे. टास्क फोर्सकडूनही माहिती घेतली जात आहे. राज्यातील करोना परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांचे लसीकरण सुरू असून 12 ते 15 या वयोगटातील मुलांनादेखील लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. सध्या हे बुस्टर डोस खासगी रुग्णालयातून दिले जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
राज्यात मंगळवारी फक्त 137 नवीन करोनाबाधित आढळून आले आहे. यापूर्वी राज्यात दिवसाला 60 हजार रुग्णांची नोंद होत होती. यावरून राज्यातील सध्याची स्थिती नियंत्रणात असून घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारकडून कोविड-19 संदर्भातील प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णांवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.