पुणे – अश्व शर्यतींचेही एक खूप मोठे विश्व आहे. करोनाचा फटका जगभरात अनेकांना बसलेला असताना हे विश्वदेखील त्याला अपवाद कसे असेल? भारतासह जगभरात होत असलेल्या या अश्व शर्यतींनाही करोनाचा फटका बसला असून लाखो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
भारतातही अश्व शर्यतींचा खूप जुना इतिहास आहे. 1777 साली चेन्नईत (मद्रास) पहिली अश्व शर्यत झाली. सध्या याची व्याप्ती वाढली असून देशात 9 मोठे व प्रसिद्ध रेसकोर्सवर या शर्यती होतात. त्याला जनाधारही खूप मोठा आहे. देशात सहा अधिकृत रेसिंग संस्था असून त्यांच्याच देखरेखीखाली देशभरात विविध शहरांत या शर्यती होतात.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुंबई, पुण्यापाठोपाठ चेन्नई व अन्यत्र या शर्यती आयोजित केल्या जातात. या शर्यतींवर अनेक कुटुंबांचे पोट अवलंबून आहे. हॉर्स ट्रेनर, खरार करणारे कर्मचारी, अश्वांचे मालक, कामगार, रेसकोर्सची निगा राखणारे कामगार अशा कितीतरी लोकांवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे.
रेसकोर्सचे पदाधिकारी तसेच अश्वमालक या कर्मचारी वर्गाची काळजी घेत आहेत. मात्र, करोनाचा धोका कधी संपेल, आणि अश्व शर्यतींचा ठप्प झालेला हंगाम कधी सुरू होणार हे या घडीला कोणीही सांगू शकत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
देशात रेस क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीचे अश्व वापरणे बंधनकारक आहे. तसेच भारतात हा एक खूप मोठा उद्योग म्हणून नावारूपाला आलेला आहे. यातून देशाला 28 टक्के जीएसटी रकमेचा तोटा होत आहे. रेसबुक प्रकाशित करणाऱ्यांच्याही व्यवसायावर गदा आल्याचे सांगितले जात आहे.
इंग्लंडमध्ये रेसला प्रेक्षकच नाहीत
युरोपसह इंग्लंडमध्येही करोनाचा धोका कमी झाल्यावर गेल्या आठवड्यात लंडनमध्ये झालेल्या एका अश्व शर्यतींकडे प्रेक्षकांनीही पाठ फिरवल्याने आयोजकांच्या चिंतेत भर पडली असून हे चित्र केव्हा बदलणार, याचीही हुरहुर लागली आहे.