मुंबई – मुंबई पोलिस दलावरील ताण कमी करण्यासाठी तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
ही भरती जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी असेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई पोलिसांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या मुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी अशा प्रकारची भरती करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांवर कामाचा सर्वाधिक ताण आहे. त्यातच मुनष्यबळाची कमतरता असल्याने पोलिसांवर जास्तीचे काम पडत होते. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच नवीन भरती पूर्ण होण्याआधी या प्रकारची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील मनुष्यबळाच्या टंचाईमुळेच पोलिस आयुक्तांनी कंत्राटी भरतीची विनंती केली होती.
आगामी काळात राज्यात नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात पोलिसांवरील ताण आणखी वाढणार आहे. अशा सणांच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे.
11 महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती कायम राहणार आहे. मुंबई पोलिस दलातील कंत्राट संपले की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील.
यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.