नवी दिल्ली :- सुपर ओव्हरही टाय झाल्यावर सर्वाधिक चौकार फटकावणारा संघ 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेता ठरवण्यात आला होता. या सामन्यात याच विचित्र नियमाच्या आधारावरच इंग्लंडने पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावरून वारेमाप टीका झाल्यावर आता आयसीसीने हा नियमच बदलला असून चौकारांवर नव्हे तर सुपरओव्हरवरच सामन्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत आता बदललेल्या नियमानुसार सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरद्वारेच होणार आहे. अर्थात त्यासाठी किती सुपर ओव्हर होतील यावर अद्याप आयसीसीने भाष्य केलेले नाही. कारण इंग्लंडने मिळवलेल्या विजयाच्या वेळी सुपर ओव्हरही टाय झाली होती.
भारतात होत असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेत तीन महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत.
त्यातील सामन्याचा निकाल ठरणे हा नियम सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. एखाद्या लढतीचा निर्णय सुपर ओव्हरनंतरही न झाल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवून निकाल लावण्यात येईल. आयसीसीने स्पर्धेसाठी तयार केलेल्या प्लेइंग कंडिशनमधील नियम 16.3 नुसार साखळीतील सामनाही बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.
त्यातही निर्णय न लागल्यास पुन्हा सुपर ओव्हरच खेळवण्यात येईल. हा सामना जास्तीत जास्त लांबवण्याची वेळ रात्री 11.20 पर्यंत सुरू राहील व तोपर्यंत निकाल न लागल्यास ती लढत अनिर्णित असल्याचे जाहीर करत दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. आयसीसीने मैदानावरील सीमारेषा खेळपट्टीच्या मध्यापासून कमीत कमी 65 यार्ड तर जास्तीत जास्त 90 यार्ड असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.