– रमेश जाधव
रांजणी -पावसाळ्यानंतर साथीच्या रोगाला दरवर्षी अनेक लोकांना सामोरे जावे लागते डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया, चिकुनगुनिया, कावीळ आदी साथीच्या रोगांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डोके वर काढल्याने या विषाणूजन्य साथीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
पावसाळ्याच्या दिवसात अनेक दिवस पाणी साचल्याने त्या पाण्याचा निचरा होत नाही. अशा साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्ण आटोक्यात येत असतानाच साथीच्या रोगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभाग साथीच्या रोगाविरुद्ध सज्ज झाला असून नालेसफाई, फवारणी, जंतुनाशक औषधे अशा प्रकारे उपाययोजना करून, नागरिकांच्या जीवाची काळजी घेत असले
तरी नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात असलेले टायर, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या किंवा पाणी साचून राहील अशा वस्तूंची विल्हेवाट लावावी. थंडी, ताप, जुलाब किंवा
उलट्या अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास ताबडतोब सार्वजनिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा किंवा आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
करोनाची संभाव्य तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे नीती आयोगासह गृह मंत्रालयाच्या एका विशिष्ट समितीने सांगितले आहे. या लाटेचा प्रभाव बालकांवर होणार असल्याचे संकेतही दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकुनगुनिया, काविळ या आजारांपासून लहान मुलांना धोका संभवत असल्यामुळे त्यांचीही जास्तीत जास्त काळजी पालकांनी घ्यायला हवी, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.