भगवंत लोहार
मल्हारपेठ – गतवर्षी पाटण तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे पाटण पुरवठा विभागाकडील धान्याला मोठा फटका बसला होता. सुमारे पाच ट्रक धान्याचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ व डाळ आदीचा समावेश आहे. हे धान्य सध्या खाण्यायोग्य नाही. या धान्याचा पुरवठा शाखेने बोली पद्धतीने लिलावही केला. मात्र त्याकडे पाटण विभागातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली.
आता या धान्याचा खतासाठी वापर करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.दरवर्षी पावसाळ्यात पाटण शहराला फटका बसतो. पावसाळा आला की नागरिकांच्या मनात भितीचे सावट निर्माण होते. कोयना नदीचे पात्र पाटण शहराला लागून असल्याने अतिवृष्टीचा फटका पाटणला नेहमीच बसतो. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाटण शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
चार दिवस पाटणचा संपर्क तुटला होता. यावेळी कराड-चिपळूण रस्त्यालगत झेंडा चौकाजवळ असणारे शासकीय धान्याचे गोडाऊन दोन दिवस पाण्याखाली राहिले होते. या गोडाऊनमध्ये असणारे संपूर्ण धान्य भिजले होते. पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने गहू, तांदूळ व डाळ आदी धान्य वाचविण्याचा प्रयत्न केला.
या गोडाऊनमध्ये सुमारे 36 ट्रक धान्य होते. त्यापैकी 31 ट्रक धान्य हलविण्यात पुरवठा विभागाला यश आले होते. मात्र, 5 ट्रक धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे धान्य अनेक दिवस पाण्यात राहिल्याने त्यातील धान्य कुजले. काही दिवसांनी या धान्याचा वास येऊ लागला होता.
या गोडाऊन जवळच दाट नागरी वस्ती आहे. या कुजलेल्या धान्याचा दुर्गंध संपूर्ण वसाहतीमध्ये पसरला होता. त्याचा नागरिकांना त्रास होऊ लागल्याने संबंधित धान्य हटविण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली.
महसूल विभाग व पुरवठा विभागाने बोली लिलाव पध्दतीने या धान्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. पाटण शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनीही त्याकडे पाठ फिरवली होती. धान्य कुजल्याने पुरवठा विभागाने या धान्याच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच पुणे येथील प्रयोग शाळेत धान्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
हे धान्य मानव, पशु-पक्षी यांना खाण्यास योग्य नसल्याचे आणि ते केवळ खत म्हणून उपयोगात येणार असल्याचा अहवाल प्रयोग शाळेने दिला होता. त्यामुळे याची विल्हेवाट केवळ खत म्हणून करावी लागणार आहे. धान्याचा साठा मोठा असून अखाद्य म्हणून धान्याचा दर प्रति किलो 1.75 रुपये इतका आहे. या धान्याची किंमत सुमारे 85 हजार इतकी आहे. स्थानिक पातळीवर विल्हेवाट लागणे शक्य होणार नाही. त्यासाठी खत कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
गेल्यावर्षी पुरामुळे भिजलेले धान्य अखाद्य रूपाचे असून त्याचा वापर फक्त खत म्हणून होणार आहे. या धान्याचा लिलाव काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अजूनही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धान्याचा साठा जास्त असल्याने खत कंपन्यांनी संपर्क साधन्याची गरज आहे.
समीर यादव
तहसीलदार पाटण
पाच ट्रक धान्य
पूर परिस्थितीच्या अगोरद गोडाऊनमध्ये 19 ट्रक गहू, 15 ट्रक तांदूळ आणि 2 ट्रक डाळ होती. पुराच्या तडाख्यातून 16 ट्रक गहू, 13 ट्रक तांदूळ आणि पावणे दोन ट्रक डाळ वाचविण्यात यश आले. मात्र 3 ट्रक गहू, 2 ट्रक तांदूळ आणि पाव ट्रक डाळ असे सव्वा पाच ट्रक धान्य भिजून नुकसान झाले.