पाबळ – बॅंकेतील खात्यामधील रक्कम फसवणूक लुटली असेल तर फक्त संबंधित बॅंकेलाच कळवणे आणि कळवल्याची स्वीकृती घेतली गेली तर नव्वद दिवसांच्या आत संबंधित व्यवहाराचे निराकरण करण्याची जबाबदारी त्या बॅंकेची असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. याबाबत संबंधित बॅंकेचीच जबाबदारी निश्चित केली आहे. अर्थात ग्राहकाने बॅंकेला त्वरित कळवले नाही तर आळशीपणाचा फटका ग्राहकाला बसणार आहे. यासाठी ग्राहकांना दिलासा दिला असून बॅंकांना फर्मान सोडून फसवणुकीचे प्रकार आता टाळता येणार आहे.
डिजिटल व्यवहाराबाबत जागृती झाल्यानंतर मोबाइल बॅंकिंग, ऑनलाइन बॅंकिंग, एटीएम कार्ड सुविधा आदी पर्याय पुढे आले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू झाले आहेत. काही त्रुटी पुढे आल्या. त्यातीलच एक त्रुटी म्हणजे गोड बोलून, पीन नंबर विचारणे, एटीएमच्या माध्यमातून डुप्लिकेट कार्डमध्ये हातचलाखी करून खात्यातून रक्कम परस्पर काढणे हे प्रकार राजरोस सुरू झाले आहेत. यातून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात आहे.
मात्र, तक्रार कुठे करायची आणि पैसे परत मिळणार का, याबाबत ग्राहकांमध्येच साशंकता होती. पीन नंबर देणारे ग्राहकच होते. त्यामुळेच अपराधीपणाची भावना होती. त्यामुळे पोलिसांत तक्रार करणे हा एकच पर्याय होता. मात्र तो मार्गच चुकीचा होता, हीच बाब आता चव्हाट्यावर आली आहे. रिझर्व्ह बॅंकेनेच यात स्पष्टता आणल्याने हा संभ्रम दूर झाला आहे.
ज्या बॅंकेच्या खात्यातून रकमा काढल्या गेल्या, त्या बॅंकेकडे संपर्क करायचा आहे. त्वरित आपली तक्रार नोंदवायची आहे. ती नोंदवल्याची स्वीकृती घ्यायची, याप्रमाणे प्रक्रिया आहे. नव्वद दिवसांत लांबलेली रक्कम परत मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
ग्राहकांसाठी पारदर्शकता गरजेची
काही दिवसांपूर्वी मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा फटका सरळ बॅंकांनाच बसला होता. त्यातील रक्कम परत मिळवण्यात आली होती. त्यामागे बॅंकांच्या त्रुटी शोधून चलाखीच करण्यात आली होती. तसाच प्रकार सर्वसामान्य ग्राहकांच्या बाबतीत झाला आहे. ही माहिती यापूर्वीच ग्राहकांपर्यंत स्पष्ट का पोहोचवण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी ग्राहकांनी आवाज उठवण्याची गरज पुढे आली आहे.
माहितीअभावी ग्राहक अनभिज्ञ
वास्तविक यापूर्वी घडलेल्या घटनांनंतर ग्राहकाने प्रथम बॅंकेलाच कळवले असताना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला कोण देत होते, त्यातही पुन्हा सायबर विभागाकडे जाण्याचा सल्ला कोठून मिळत होता. त्यात चुकीचे खापर स्वतःवर लादून घेतले जात असल्याने हवालदिल व दडपणाखाली दबलेल्या ग्राहकाची माहिती प्रसिद्ध होणे हाच प्रवाद राहिला आहे. त्यामुळे महितीअभावी अनेकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.