नवी दिल्ली – गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकामाचा खर्च कमी करायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरने आयोजित केलेल्या ‘भारतातील रस्ते विकास’ या विषयावरील 17व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, रस्ते बांधणीत टाकाऊ रबर आणि प्लॅस्टिक यासारख्या सामग्रीचा वापर करून सिमेंट आणि स्टीलवरील अवलंबित्व कमी केले जाऊ शकते. नवनिर्माण, उद्योजकता, विज्ञान, संशोधन, कौशल्य याला आपण ज्ञान असे संबोधतो त्याचा भविष्यासाठी उपयोग हवा.
केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले, की डीपीआर तयार करण्यासाठी कंत्राटदार आणि कंपन्यांना रेटिंग देण्याचे धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल, बायो सीएनजी आणि इलेक्ट्रिक ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, देशात अधिक पर्याय आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याची हीच वेळ आहे. बायोमासपासून बिटुमन बनवण्यासाठी धोरण तयार करण्याचेही नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी रस्ता सुरक्षेवरही भर दिला आणि सर्व संबंधितांकडून या क्षेत्रात अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.