पाबळ (प्रतिनिधी) : आंबेगाव शिरूर मतदारसंघातील प्रमुख व मोठी गावे असलेल्या पाबळ व केंदूर या दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे माध्यमातून मार्गी लागला असून या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती पाबळचे सरपंच मारुती शेळके व माजी सरपंच सुवर्णा थिटे यांनी दिली.
तब्बल छप्पन ते सत्तावन्न कोटी रुपये खर्चाची ही योजना अस्तित्वात येत असून चिंचोशी येथील चासकमान डावा कालव्यातून पाणी उपलब्ध केले जाणार आहे. या योजनेद्वारे दरडोई 55 लिटर शुद्ध पाणी नागरिकांना पुरवण्यात येणार आहे. यासाठी केंदूर येथे पाणी साठवण तर पाबळ येथे शुद्धीकरण प्रकल्पासह सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी सौर ऊर्जा उपयोगात येणार असल्याने वीज बिलाचा खर्च वाचणार आहे.ठराविक कालावधीनंतर ग्राम पंचायतकडे या योजनेचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक भोर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनाचे श्री मिलिंद रोकडे व टीम. निसर्ग एजन्सीचे श्री लक्ष्मण कवठे, मुख्य अभियंता रहाणे, अधीक्षक अभियंता भुजबळ, कार्यकरी अभियंता भोई, उपअभियंता राऊत यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती शेळके यांनी दिली.
गेली वर्षभर या योजनेसाठी माजी सरपंच सुवर्णाताई थिटे , पाबळ चे सरपंच मारुती शेळके ,केंदूरचे सरपंच सुनील बापू थिटे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थिटे. सचिन वाबळे. माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे. शाहूराज थिटे यांनी पाठपुरावा केला .