मुंबई – देशाला 2014पासून ग्रहण लागले आहे. शेतकरी, तरुण, व्यापारी वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आले आणि संविधान व्यवस्था बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देश बलशाही बनवण्यासाठी वाटचाल सुरु असताना ते स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला.
कॉंग्रेसच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कॉंग्रेसे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली.
नाना पटोले म्हणाले, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 साली ऑगस्ट क्रांती मैदानातून “चले जाव’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले. “चले जाव’च्या आंदोलनाने इंग्रज सत्तेला हादरा बसला आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होऊन देशात लोकशाही व्यवस्था आली.
या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. परंतु स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक आज सत्तेत असून मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या करत आहेत. ही लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन पटोले यांनी केले.
देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्ष संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.
“भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ
याच मैदानातून 1942 साली महात्मा गांधींनी अन्यायाच्या विरोधात आवाज दिला होता. याच मैदानातून जुलमी इंग्रज राजवटीला “चले जाव’चा नारा दिला होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी इंग्रजांविरोधात “चले जाव’चा नारा दिला होता. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता “भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे, असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.