इस्लामाबाद – सरकारी यंत्रणांना बदनाम करण्यासाठी इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक कट केला होता. सरकारी यंत्रणांना गोवण्यासाठी एक बनावट छापा दाखवून यंत्रणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याची योजना आखण्यात आली होती, असे इम्रान खान यांच्या निकटवर्तीयांच्या फोन संभाषणावरून उघड झाले आहे, असे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले.
“पीटीआय’च्या नेत्यांवर हा बनावट छापा घालण्यात येणार होता. यावेळी बलात्कारही केले जाणार होते, असे या कटामध्ये ठरले होते, असे सनाउल्लाह यांनी सांगितले. मात्र या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. इम्रान खान यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. राणा सनाउल्लाह हे प्रसिद्धी माध्यमांमध्ये सनसनाटी पसरवण्यासाठी हे आरोप करत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान इम्रान खान यांच्या 33 समर्थकांना लष्कराशी संबंधित ठिकाणांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून लष्करी न्यायालयात खटला चालवण्यासाठी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे. या महिन्याच्या 9 तारखेला इम्रान खान यांना झालेल्या अटकेनंतर हजारो जणांना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींमध्ये या 33 आरोपींचा समावेश आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलेल्यांवर अतिक्रमण केल्याचा आणि संवेदनशील लष्करी ठिकाणांची तोडफोड केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आले आहे, असे राणा सनाउल्ला यांनी शुक्रवारी सांगितले “पीटीआय’च्या आंदोलकांनी महत्वाची उपकरणे, संगणक आणि डेटा संकलनाचे इतर स्त्रोत बिघडवले आणि डाटा चोरल्याचे पुराव्याने सिद्ध झाले आहे. सीमेबाहेरील क्षेत्रांचे उल्लंघन करण्यात गुंतलेल्यांनाच लष्करी कायद्यांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागेल. लष्करी न्यायालयात सामूहिक खटले होणार नाहीत, असे सुचवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
इम्रान खान यांच्यावरही लष्करी न्यायालयात खटला चालवला जाऊ शकतो. ते या सर्व गोंधळाचा आणि नियोजनाचे सूत्रधार आहेत, असे त्यांच्याकडील पुराव्यावरून असे दिसून येते आहे. लष्करी न्यायालयांच्या निकालानंतर आरोपींना उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असेल, असेही सनाउल्लाह म्हणाले.