नगर -जिल्हा सरकारी रुग्णालयात चांगल्या कामाला जास्त विरोध होत आहे. त्यातही त्यांना इंटरेस्ट असलेल्या प्रकारांत माझा अडथळा होतो. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर जमेल तसे आरोप करुन मला सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी किंवा थेट निलंबित करण्यासाठी दुखावलेले कर्मचारी आणि एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे हे षडयंत्र असल्याचा पलटवार निवासी वैद्यकीय अधिकारी सुनील पोखरणा यांनी केला आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयातून करोनाबाधित कक्षासाठी मदत म्हणून मिळालेले संरक्षण कीट पळविल्याचा पोखरणा यांच्यावर आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तक्रारदार दादासाहेब काळे यांचे उपोषण सुरू आहे. या मुद्यावर डॉ. सुनील पोखरणा यांनी आज त्यांची सविस्तर बाजू दैनिक प्रभातकडे लेखी स्वरुपात मांडली. कीट पळविल्यासंदर्भात होणारे आरोप धादांत खोटे आणि खोडसाळपणाचे तसेच प्रशासनाला वेठीस धरणारे आहेत. त्यात प्रशासकीय कामातून दुखावलेले कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारीच संघटनांना हाताशी धरुन खोटी माहिती पुरवित आहेत. त्यातून माझ्यावर आरोप होत आहेत. मुंबईतील केईएम हॉस्पीटल यांच्यामार्फत नगरच्या सरकारी रुग्णालयात वरील संरक्षण कीट 15 एप्रिलला मिळाले.
दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास तेथे अचानक कामानिमित्त उपस्थित झालेल्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. हर्षवर्धन तन्वर यांच्या हस्ते कीट स्वीकारले. वरिल पदाधिकारी बसलेले होते. त्याचवेळी जिल्हा सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या काही डॉक्टर व स्टाफमधील कर्मचाऱ्यांनी त्यातील काही वस्तु उचलल्या. मात्र, हे कीट करोनाबाधित कक्षात काम करणाऱ्या अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मागविलेले होते. त्यामुळे डॉ. हर्षवर्धन तन्वर यांच्या सूचनेवरुन ते उचलून एसीएस केबिनमध्ये पाठविण्यासाठी माझ्याच स्वत:च्या चारचाकी वाहनात ठेवले.
त्यावेळी सरकारी वाहन उपलब्ध नव्हते, म्हणून ते कीट माझ्या वाहनातून एसीएस केबिनकडे पाठविण्यात आले. त्याची नंतर औषध भांडारच्या पडताळणी रजिस्टरला नोंदही करण्यात आली. त्यामुळे माझ्या वाहनातून ते कुठे पाठविण्यात आले, हे जाणीवपूर्वक लपवून अर्धवट माहिती संघटनांना देण्यात आली. त्यावरुन माझ्यावर खोटे आरोप सुरु झाले. वास्तविक याचा वापर अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांसाठीच झाला असल्याने ते कीट मी पळविले, या आरोपात काहीच तथ्य नसल्याचा दावाही डॉ. सुनील पोखरणा यांनी केला.
“त्यांच्या’ खातेनिहाय गोपनिय चौकशीची मागणी..!
जिल्हा रुग्णालय संस्थेचे कुठेही नुकसान होऊ नये, म्हणून मी जास्त काळजी घेतो. ती नाठाळ कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच अडचणीची ठरते. माझ्यामुळे त्यांचे “हित’ कुठेच साधले जात नाही. त्यामुळे माझ्यावर नेहमीच वॉच ठेवून मला कसे अडचणीत आणता येईल, हाच विचार त्यांच्याकडून दिवसभर सुरू असतो. आता त्यांचीच नाशिक येथील उपसंचालक यांच्याकडे खातेनिहाय गोपनिय चौकशीची मी मागणी करत आहे.