नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या यात्रेवर टीका करत आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिसवा सरमा यांनी यांनी १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीचा संदर्भ देत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “भारत जोडलेला आणि एकसंध देश आहे. त्यामुळे गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात सुरू करावी”,असा खोचक सल्ला सरमा यांनी गांधी यांना दिला आहे.
यात्रेविषयी बोलताना सरमा यांनी,“१९४७ साली काँग्रेसने भारताचे विभाजन केले. राहुल गांधींना जर भारत जोडो यात्रा सुरु करायची असेल तर त्यांनी ती पाकिस्तानातून करावी. भारतात ही यात्रा सुरू करण्याचा फायदा काय?”, असा सवाल सरमा यांनी केला आहे. काँग्रेसने या यात्रेच्या प्रचारासाठी हिंदी भाषेत एक गाणे प्रसिद्ध केले आहे. देशातील इतर भाषांमध्येही हे गाणे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या अधिकृत संकेतस्थळावर या अभियानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी दिली आहे. “ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ नाही. नागरिकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपक्रम आहे”, असे रमेश यांनी म्हटले आहे.
“काँग्रेसला सकारात्मक राजकारण करायचे आहे. आम्हाला जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडवायच्या आहेत”, असे मत या यात्रेवर एका व्हिडीओद्वारे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.