पाटणा – काॅंग्रेसचे लोक हंगामी हिंदू आहेत, हे संपूर्ण भारताला माहिती आहेत. जेव्हा त्यांना हिंदूंची मते मिळवायची असतात, तेव्हा ते मवाळ हिंदू बनतात. अगदी आपण जानवेधारी हिंदू असल्याचा आवही आणतात. पण त्यांच्यामध्ये अयोध्येला जाण्याची नैतिक क्षमता नसल्याने,
काॅंग्रेस नेत्यांनी प्राणप्रतिष्ठेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, हे त्यांच्या मानसिक धारणेला अनुसरून असल्याने, त्याचे आश्चर्य वाटले नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही कितीही यात्रा काढा; पण समस्त भारतीयांच्या मनात वसलेल्या राम मंदिराविषयी आस्था नसेल, तर भारतीय लोकच तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असे सांगून गिरिराज सिंह पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून काँग्रेसमध्ये कोणीही अयोध्येला गेलेले नाही.
काँग्रेस पक्षानेच अयोध्या खटला न्यायालयात लांबवला. त्यामुळे अयोध्येत जाण्याची नैतिक ताकद त्यांच्याकडे नाही. आज काँग्रेसविरोधात बोलण्याची गरज नाही. काँग्रेस हा आत्मघातकी पक्ष आहे. काँग्रेसबद्दलचे सत्य आता जनतेला कळले आहे.
तृणमूलही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच एवढेच नाही तर गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की ममता बॅनर्जींचा पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि अशी कंपनी इतर कोणालाही शेअरहोल्डर बनवत नाही.
पक्षाचा सुपर शेअरहोल्डर त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हाच आहे. हे सर्व काही जनतेला माहीत आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना निश्चितच उत्तर देईल. शिवाय पक्षाच्या नावातच काॅंग्रेस हा शब्द आहे, हे कोणीही विसरु नये, अशी खोचक टिप्पणीही गिरीराज सिंह यांनी केली.