नवी दिल्ली :- गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा आयोजित केली होती. त्या यात्रेला या वर्षी 7 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभर जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या यात्रा काढण्याचे नियोजन कॉंग्रेस पक्षाने केले आहे. या यात्रांचा कालावधी आणि तपशील ठरवण्याचे काम सध्या सुरू आहे.
राहुल गांधींनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून यात्रा सुरू केली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये त्यांच्या या महत्त्वाकांक्षी 145 दिवसांच्या यात्रेचा समारोप केला. मी ही यात्रा माझ्यासाठी किंवा कॉंग्रेससाठी नाही, तर देशातील जनतेसाठी केली आहे. या देशाचा पाया उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहण्याचा संदेश आम्ही यानिमित्ताने दिला आहे, असे राहुल गांधी श्रीनगरमधील समारोपाच्या सभेत म्हणाले होते.
यात्रेदरम्यान राहुल गांधींनी 12 सार्वजनिक सभा, 100 हून अधिक कोपरा सभा आणि 13 पत्रकार परिषदांना संबोधित केले. त्यांनी 100हून अधिक बैठे संवाद साधले. या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता व राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारण्यास त्यामुळे मोठी मदत झाली आहे. त्यातून निर्माण झालेले वातावरण कायम टिकवण्यासाठी कॉंग्रेसने आता जिल्हास्तरीय यात्रांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेत देशातील अनेक नामवंत लोकही सहभागी झाले होते. त्यात कमल हसन, पूजा भट्ट, रिया सेन यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींसह स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी, अमोल पालेकर, माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर, माजी नौदलप्रमुख ऍडमिरल (निवृत्त) एल. रामदास आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि माजी वित्त सचिव अरविंद यांसारख्या प्रख्यात लोकांसह विविध क्षेत्रांतील नामवंतही सहभागी झाले होते.