Congress Social Campaign : लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे सर्व पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत. त्यातच आता काँग्रेसने पंतप्रधानांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरुनही कॅम्पेन सुरु केले आहे. त्यासाठी काँग्रेसने ‘डरपोक राजा’ या नावाने कँपेन सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसकडून या कॅम्पेन अंतर्गत एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात,”आपल्या देशात एक डरपोक राजा आहे. त्याला भीती वाटली की तो घाबरतो आणि शांत बसतो. हरणं त्या राजाला आवडत नाही त्याला भीती वाटते. निवडणूक आली की काँग्रेसच्या विजय होणार या भीतीने तो राजा गर्भगळीत होतो. तो राजा म्हणजे हुकुमशाह आहे, तो एक ढोंगी आहे, तो एक डरपोक आहे. त्यामुळेच हा राजा सरकारी एजन्सींचा दुरुपयोग करतो.” असे म्हटले आहे.
त्यासोबतच “विरोधकांना घाबरवण्यासाठी हा राजा ईडी, आयटी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पाठवतो. मात्र काँग्रेस पक्ष कुणालाच घाबरत नाही. कारण काँग्रेस हा तो पक्ष आहे ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच इंग्रजांना धूळ चारली. आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर त्यांच्या गुलामांना कसे घाबरु? काँग्रेस पक्षाचे लीडर निडर आहेत. त्यामुळे आम्ही सांगतो मुळीच घाबरु नका. ही लढाई देशाची लोकशाही वाचवण्यासाठीची आहे. ही लढाई आपण लढणार आणि जिंकणारही. जय हिंद!” या आशयाचा हिंदी मेसेज करत काँग्रेसने मोदींचा उल्लेख डरपोक राजा असा केला आहे.
𝗘𝗸 𝗗𝗮𝗿𝗽𝗼𝗸 𝗥𝗮𝗷𝗮 pic.twitter.com/zC4ORe3lKD
— Congress (@INCIndia) November 13, 2023
काँग्रेसने हे कँपेन सुरु केलंय जे सोशल मीडियावर अनेकांनी रिपोस्टही केलं आहे. दरम्यान, “काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदी केली की काळा पैसा बाहेर येईल आणि संपुष्टात येईल. काळा पैसा मिटला का? उलट वाढला. त्यांनी म्हटलं होतं GST आणतो, देशाची प्रगती होईल. जीएसटीचा कुणाला फायदा झाला का? उलट महागाई वाढली. काँग्रेसच्या कार्यकाळात ४०० रुपयांचा सिलिंडर मिळत होता आज किंमत किती झाली? १२०० रुपये. नरेंद्र मोदी म्हणाले होते १५ लाख रुपये प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये जमा होतील. शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदे गौतम अदाणींसाठी आणत आहेत. अशा प्रकारचे आरोप राहुल गांधींनी केले होते. आता काँग्रेसने एक व्हिडीओ पोस्ट करत मोदींना डरपोक राजा म्हटले आहे. त्याला आता भाजपकडून काय उत्तर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.