नवी दिल्ली – मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या बाजूने निकाल देत शिक्षेला तूर्त स्थगिती दिली आहे. निकालानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘प्रेमाचा द्वेषावर विजय होतो’ असे ट्विट करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस नेते आलोक शर्मा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सत्याचा विजय झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचवेळी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी निकालानंतर सांगितले की, राहुल गांधींविरोधात रचलेला कट फसला आहे. त्यांचा हा विजय भाजपला जड जाणार आहे.
या निकालानंतर काँग्रेसने सलग दोन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. पहिल्या ट्विटमध्ये काँग्रेसने लिहिले की, ‘हे द्वेषाच्या विरोधात प्रेमाचा विजय आहे’. दुसर्या ट्विटमध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या संसदेचा जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अदानी आणि मोदी यांचा फोटो एकत्र धरला आहे. काँग्रेसने राहुलच्या या फोटोसोबत लिहिले आहे की, मी येत आहे आणि प्रश्न पडतच राहतील. म्हणजेच राहुल संसदेत येऊन प्रश्न विचारत असल्याबद्दल काँग्रेस बोलत आहे. या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.