नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या कॉंग्रेस मंत्र्यांनी मंगळवारी दिल्लीचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी झाला.
त्यानंतर कॉंग्रेसचे मंत्री पक्षश्रेष्ठींचे आभार मानण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी सोनिया आणि राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यावेळी मंत्र्यांसमवेत कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल हेही होते.
महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. सत्तावाटपाच्या सुत्रानुसार कॉंग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदे आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेसमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, पक्षाच्या काही नेत्यांनी काही मंत्र्यांच्या निवडीवर आक्षेप घेतल्याचे संकेत मिळत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेस मंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचे महत्व वाढले आहे.