चंदीगड – स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीच्या वेळी कॉंग्रेसने कर्तापुर साहिब पाकिस्तानला जाऊ दिल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंजाबच्या छातीवर फाळणीची रेषा आखली गेली होती. फाळणीच्या वेळी कॉंग्रेस नेत्यांना सत्ता मिळवायची इतकी घाई होती की त्यांनी श्री कर्तापुर साहिब पाकिस्तानला जाऊ दिलं. आमच्या पंतप्रधानांनी कर्तारपूर साहिब कॉरिडॉर बांधला आणि शिख भाविकांना सुविधा मिळवून दिली असे ते म्हणाले.
कॉंग्रेसवर सडकून टीका करताना संरक्षण मंत्री म्हणाले, “ज्या कॉंग्रेसने लोकशाहीला सर्वात मोठा धक्का दिला आहे, ती कॉंग्रेस म्हणतेय की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. देशात लोकशाही संपली असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये निवडणुका कशा जिंकता? असा सवाल त्यांनी केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित ‘संपर्क से समर्थन’ या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.
कर्तापुर साहिबवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “जर हे दुख पहिल्यांदा कोणाला समजले असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे कर्तापुर साहिब पुन्हा पंजाबशी जोडले गेले आहे. भाजप सरकारने या नऊ वर्षात काय केले हे लोकांना चांगले माहीत आहे. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत संरक्षण मंत्री म्हणाले की पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे आणि कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये त्यांच्याशी केंद्राचा चांगला समन्वय होता. जेव्हा जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी केंद्र सरकार जबाबदारीची भूमिका निभावत असते असे ते म्हणाले.
शीख समाजाच्या देशभक्तीचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, मी देशाचा संरक्षण मंत्री आहे आणि मला पंजाब आणि पंजाबियतची चांगली जाण आहे. जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा येथील शिख समुदाय व नागरीक एकत्र उभे ठाकतात. येथील तरूणांचे लष्करातही मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.