नवी दिल्ली – हिडेनबर्ग अहवालानंतर अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक काही दिवसांपासून संसदेत अदानीशी संबंधित मुद्दे सातत्याने उपस्थित करत आहेत. मात्र, केंद्र सरकार अदानी प्रकरणावर लक्ष देत नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत निवेदन देण्यासाठी संसद ते ईडी कार्यालयापर्यंत आज मोर्चा काढण्यात आला.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निषेध मोर्चादरम्यान सांगितले की, अदानी घोटाळ्याप्रकरणी आम्ही सर्वांनी ईडीच्या संचालकांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढला होता. मात्र सरकार अदानी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी आम्हाला विजय चौकाजवळ थांबवले आहे. अदानीने लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे एलआयसी, एसबीआय आणि इतर बॅंका डबघाईला आल्या आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
आम्ही 17-18 राजकीय पक्षांच्या सर्व खासदार मिळून आज निषेध मोर्चा काढला, परंतु हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. आज आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, अदानीने अडीच वर्षांत लाखो आणि करोडो रुपये कसे कमवले आहेत. आम्ही 200 आहोत आणि आम्हाला थांबवण्यासाठी या ठिकाणी 2000 पोलीस आहेत. त्यामुळे सरकारकडून आमचा आवाज दाबायचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम-
अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कॉंग्रेससह विरोधी पक्ष जेपीसीची मागणी करत आहेत. त्यामुळे सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्ष अदानींच्या मुद्द्यावरून आवाज उठवत आहेत. अदानी प्रकरणाला कॉंग्रेसचा सक्रिय विरोध असून या मुद्द्यावरून कॉंग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे. अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ विविध राज्यांतील कॉंग्रेस समित्या निषेध मोर्चे काढत आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सभागृहात मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे.