नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अशी मागणी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात केलेल्या आक्षेपार्ह विधानांबद्दल आधी उत्तर देऊन त्यांनीच देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही खर्गे यांनी केली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की,राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करणाऱ्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की जेव्हा मोदीजींनी पाच-सहा देशांमध्ये जाऊन आपल्या देशातील लोकांचा अपमान केला आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे. मोदी एकेठिकाणी तर असे म्हणाले आहेत की मी हिंदुस्तानात जन्माला आलो हे पाप आहे. मागच्या जन्मी आम्ही काय पाप केले की आम्हीं हिंदुस्तानात जन्माला आलो आहोत असे मोदींनी म्हटले होते.
खर्गे म्हणाले की सर्व लोकशाहीं मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत, अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य कमकुवत केले जात आहे, टीव्ही चॅनेलवर दबाव आणला जात आहे आणि सत्य बोलणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले जात आहे, मग ही लोकशाही संपवण्याची प्रक्रिया नाही तर काय आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. हीच बाब राहुल गांधी लंडन मध्ये बोलले आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.