नवी दिल्ली – देशासमोर सध्या गंभीर अंतर्गत आव्हाने उभी राहिली आहेत. हिंसाचारासारख्या घटनांवरून आगीत तेल ओतण्याचे काम केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपकडून केले जात आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सोडले.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येथे बैठक झाली. त्यामध्ये बोलताना खर्गे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर विविध मुद्द्यांवरून जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. तेथील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना संपूर्ण जगाने पाहिल्या. मणिपूरचा हिंसाचार हरियाणात पोहचला. त्या हिंसाचाराच्या घटनांमुळे राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत जातीय तणाव निर्माण झाला. त्या घटना आधुनिक, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत, असे त्यांनी म्हटले.
देशात 2021 या वर्षापासून प्रलंबित असणारी जनगणनेची प्रक्रिया तातडीने सुरू केली जावी. त्यासमवेत जातनिहाय गणनाही व्हावी, अशी आग्रही मागणी खर्गे यांनी मांडली. मोदी सरकारला अनेक आघाड्यांवर सपशेल अपयश आल्याची टीका त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी महागाई, बेरोजगारी, हिंसाचार, असमानता, शेतकरी आणि कामगारांची दैना आदी मुद्दे पुढे केले. अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार आत्मनिर्भर भारत, नवभारत, अमृतकाळ, तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था अशा पोकळ शब्दांचा आधार घेत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे धोका निर्माण झाला आहे. त्यातून सामान्य माणसाचे जगणे प्रभावित झाले आहे. चीनच्या अतिक्रमणाकडे सरकार करत असलेले दुर्लक्ष देशाची सुरक्षा धोक्यात घालणारे आहे, असेही त्यांनी म्हटले.
कॉंग्रेसच्या कार्यकारिणीला बैठकीला सोनिया आणि राहुल गांधी या माजी अध्यक्षांबरोबरच प्रियंका गांधी, पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री, प्रमुख नेते उपस्थित होते.