भोपाळ : पाऊस आणि पुराने तडाखा दिलेल्या मध्य प्रदेशसाठी केंद्रीय निधी उपलब्ध करावा, या मागणीसाठी कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर धरणे धरणार आहेत.
मध्य प्रदेशला काही दिवसांपूर्वी पाऊस आणि पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे. त्यासाठी मोदी सरकारकडे 32 हजार कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मध्य प्रदेशबाबत मोदी सरकार भेदभाव करत आहे. राज्याला मुद्दाम निधी दिला जात नसल्याचे चित्र आहे, असा आरोपही कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यातून थेट दिल्लीला धडक मारण्याचा निर्णय मध्य प्रदेश कॉंग्रेसने घेतला आहे. धरणे आंदोलनानंतर मोदींना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.