पुणे – आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली होऊ शकत नाही. मात्र, व्यक्तीकडे असलेला आत्मविश्वास जीवनात संघर्ष करण्यास शिकवतो. चुका झाल्या तर हरकत नाही. चुकातून शिकता येते. मात्र, आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, असे मत प्रसिध्द वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
दरम्यान वकील एकसंघ असल्याचे त्यांनी कौतुक केले. पुणे बार असोसिएशनतर्फे शिवाजीनगर न्यायालयात अॅड. निकम यांचे “फौजदारी खटल्यातील अनुभव आणि फौजदारी संहिता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या नवनिर्वाचित सचिव न्यायाधीश कश्यप यांचा सन्मान करण्यात आला.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी उपाध्यक्ष अॅड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मण येळे पाटील, अॅड. सचिव अमोल शितोळे, अॅड. सुरेखा भोसले, खजिनदार अॅड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस अॅड. शिल्पा कदम, कार्यकारिणी सदस्य अॅड. काजल कवडे, अॅड. सई देशमुख, अॅड. अर्चिता जोशी, अॅड. मजहर मुजावर, अॅड. अमोल भोरडे, अॅड. अजय नवले, अॅड. तेजस दंडगव्हाळ, अॅड. कुणाल अहिर, अॅड. रितेश पाटील, अॅड. अमोल दुरकर यांच्यासह इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अॅड. निकम यांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला आणि मुंबई येथील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्याच्या खटल्याचे अनुभव सांगितले. 1993 बॉम्बस्फोटानंतर मुंबईत गेलो. त्यावेळी पोलीस आयुक्तालय कोठे हे माहिती नाही. मराठीत शिक्षण झाले होते. इंग्रजी बोलणाऱ्यांचा सामना करू शकेल का, अशी शंका होती. मात्र, आत्मविश्वासामुळे हा खटला चालवू शकल्याचे त्यांनी सांगितले.