पुणे – अपहरण करुन खून करण्यात आलेल्या भाग्यश्री सुडे हिचे दागिने आणि मोबाइल विमानतळ पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केले आहेत. सोनसाखळी मोबाइल, कानातील रिंग मुखेड जि. नांदेड येथून ताब्यात घेतल्या आहेत. मोबाइल आरोपींनी कचराकुंडीत फेकला होता.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भायश्रीच्या घरच्यांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, हरंगुळ बु. लातूर) हिचा तिच्या मित्राने आपल्या दोन साथीदांना सोबत घेऊन खंडणीसाठी अपहरण करून ३० मार्च रोजी खून केला होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी शिवम फुलवळे (२१,रा. वाघोली, मूळ. नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (२३, रा.मुंबई, मु. सकनुर, मुखेड-नांदेड), सागर जाधव (२३, रा. कासलेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि.लातूर) यांना अटक केली आहे. शिवम हा मुख्य सूत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.
तिघे आरोपी सद्या विमानतळ पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. आरोपींकडून ९ लाखाच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र असे जरी असले तरी पोलिसांना अन्य गोष्टीबाबत संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. ज्या गाडीतून भाग्यश्रीचे अपहरण करून खून करण्यात आला, तिच गाडी घेऊन आरोपींनी नांदेड गाठले होते.