मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे जनता दरबार उपक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन या व्हायरसचे व्हेरीएंट आढळून येत आहेत, त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहे. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर हा आजच्या दिवसला 14 टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून ‘हर घर दस्तक’ या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असे टोपे म्हणाले.
राज्यात शाळा सुरु झाल्यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. तसेच खबरदारी म्हणून राज्यात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.