मुंबई – भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या संकल्प मोहिमेचा आज समारोप झाला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यावर ही मोहीम सुरू झाली होती. या कालावधीत हिंद महासागरात सागरी सुरक्षेशी संबंधित १८ घटना भारतीय नौदलाने शीघ्र आणि प्रथम प्रतिसाद देत हाताळल्या. तसेच ते या कामासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले गेलेले नौदल ठरले.
इस्त्रायल – हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं संकल्प’अंतर्गत आपल्या सागरी सुरक्षा मोहिमांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली होती. १४ डिसेंबर २०२४ रोजी माल्टाच्या एमव्ही रुएन या मालवाहू जहाजाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा शोध घेण्यात भारतीय नौदलाने सक्रिय भूमिका बजावली होती.
गेल्या १०० दिवसांत नौदलाची जहाजे, विमाने आणि विशेष दलांनी सागरी सुरक्षेसाठी आणि सागरी सेवेत कार्यरत समुदायाचे विविध अपारंपारिक धोक्यांपासून रक्षण करण्याचा निर्धार केला होता. या क्षेत्रातील धोक्यांविषयीच्या माहितीचे आकलन झाल्यानंतर एडनचे आखात आणि लगतचा प्रदेश, अरबी समुद्र तसेच सोमालियाचा पूर्व किनारा अशा तीन भागांत ही संकल्प मोहीम राबवण्यात आली.
२००८ मध्ये चाचेगिरी सुरू झाल्यानंतर हिंद महासागर क्षेत्रामध्ये प्रादेशिक आणि अतिरिक्त प्रादेशिक नौदलांच्या युद्धनौकांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली. स्वतंत्रपणे किंवा विविध बहु-राष्ट्रीय नौदलांच्या कक्षेत कार्यरत असलेल्या या युद्धनौका तैनात करण्याचे प्रमाणही सातत्याने वाढले आहे. सध्याची सुरक्षा परिस्थिती बघता, भारतीय नौदलाने या प्रदेशातील असंख्य धोक्यांमुळे उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
भारतीय नौदलाच्या उपस्थितीत ४५ भारतीय खलाशांसह ११० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवण्यात आले, १५ लाख टन खते, कच्चे तेल आणि अन्य महत्त्वाच्या वस्तूंचे संरक्षण करण्यात आले, जवळपास १ हजार सागरी कारवाया हाती घेण्यात आल्या, ३ हजार किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले आणि ४५० पेक्षा जास्त व्यापारी जहाजे सुरक्षित राखली.
डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये, गुरुग्राम येथील भारतीय नौदलाचे इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर अर्थात माहिती गोळा करण्याचे केंद्र, हे भारतीय सागरी क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण सक्षम करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून मोलाची भूमिका बजावत आहे.
संकल्प’ अंतर्गत सुरू असलेल्या सागरी सुरक्षा मोहिमांदरम्यान भारतीय नौदलाने भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे, सागरी धोक्यांचा सामना करणे, नव्याने डोके वर काढणाऱ्या चाचेगिरीला विरोध करणे तसेच भारतीय सागरी क्षेत्रात अंमली पदार्थांचा व्यापार लक्षणीयरीत्या कमी करणे अशा कामगिरींचा समावेश आहे.