वाघोली – शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदार संख्या असणाऱ्या वाघोली गावातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधांसाठी प्रशासनाबरोबर झगडावे लागत असल्याने विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाच वर्षाच्या कालावधीत वाघोलीसाठी दिलेल्या योगदानाची वाको वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पत्राद्वारे विचारणा करण्यात आली. तर डॉ. कोल्हे यांनी वाघोली व मतदार संघासाठी केलेल्या कार्याचा तपशील मांडून टीम वाकोच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पत्र प्रपंच पेटला असल्याने वाघोलीतील प्रश्नांचा मुद्दा निवडणुकीत समोर येणार आहे.
देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मतदार संघात गावभेट दौरा करीत आहेत. शिरूर मतदार संघातही उमेदवारांनी प्रचार, प्रसारामध्ये आघाडी घेतली आहे. याच मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या वाघोलीतील नागरिकांनी विद्यमान खासदारांनी पाच वर्षाच्या काळामध्ये वाघोलीसाठी केलेल्या कामाबाबतची विचारणा केली आहे.
वाको वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिलकुमार मिश्रा यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रामध्ये लिहले आहे कि, पाणी, रस्ते, सांडपाणी यासारख्या मुलभूत सोयीसुविधांपासून वाघोलीतील नागरिक वंचित आहेत. कोल्हे यांच्याकडून फुकट नाटकाचे प्रयोग व फुकट आरोग्य तपासण्या आयोजित होत आहेत, तसेच त्यांच्या वक्तृत्व शैलीतून वाघोलीकरांना फायदा झालेला नाही. निवडणुकीत मतदान करण्यासाठी वाघोलीत कोणती कामे केली अथवा कोणती कामे मार्गी लावली याचा तपशील मांडावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. कोल्हे यांनी पत्राला उत्तर देताना म्हंटले आहे कि, पीएमआरडीए कडून सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एलिव्हेटेड उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला, कोविड काळात नागरिकांना सर्वतोपरी मदत केली, वाघोलीतील अंतर्गत रस्त्यांसाठी नगरविकास विशेष निधीतून १ कोटींचा निधी मंजूर केला, खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या कार्यकक्षा निच्छित असताना संसदेत महागाई, महिला, शेतकरी, कामगारांचे प्रश्न मांडणे, सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणे हे खासदारांचे काम असते.
ग्रामपंचायत, महापालिका स्तरावरील प्रश्न संसदेत मांडणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करून वाघोलीतील समस्यांबाबत पीएमआरडीए, महापालिका आयुक्तांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले, फुकट तपासण्यांच्या माध्यमातून नागरीकांना फायदा झाला तसेच शिवपुत्र संभाजी महानाटयाच्या माध्यमातून शिवकार्य करीत आहे. आदी विस्तृत माहिती त्यांनी पत्रातून मांडली आहे.