पुणे- सध्या देशभर साजऱ्या होत असलेल्या आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने सेंट क्रांती अभियान हा कर्जपुरवठ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हे अभियान एक ऑगस्ट पासून सुरू होऊन 31 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणार आहे. या अभियानावेळी किरकोळ, कृषी आणि लघु उद्योगासाठी कर्ज पुरवठ्यात वाढ करण्यात येणार असून या संदर्भातील कर्ज प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.
त्याचबरोबर विविध सरकारी योजना ज्यामध्ये केसीसी, मुद्रा आणि स्वयंसहाय्य गटांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या प्रसतावावर विचार केला जाणार असल्याचे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या कालावधीत कर्जाच्या फेररचनेच्या प्रस्तावावरही विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.
सर्व प्रकारच्या रिटेल कर्जावरील प्रक्रिया शुल्क 31 ऑगस्ट 2022 पर्यंत माफ करण्यात येणार असल्याचे सेंट्रल बॅंकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विविध घटकांना कर्ज पुरवठा वाढावा आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी याकरिता अर्थमंत्रालयाने विविध बॅंकांना कर्ज पुरवठा वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार बऱ्याच बॅंकांनी अशा प्रकारच्या योजना गेल्या काही दिवसांमध्ये जारी केले आहेत.