हिंगोली – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि धनंजय मुंडे हिंगोली व नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले असतांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली दौरे करत आहेत.. त्यांनी दिल्ली व इतर दौरे थांबून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढावे, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथे ते बोलत होते.
पवार यांनी आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व कुरुंदा येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहेत. शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच चालु आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांना नियुक्त करून नुकसानीची माहिती घ्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हे कळायला मार्ग नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे.
यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजु नवघरे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांसह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थितीत होते.