नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने बुधवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. भाजपने राहुल गांधी यांच्या आमचा लढा एका शक्तीविरोधात असल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, कठोर कारवाईची आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे.
मुंबईत नुकतीच इंडिया आघाडीची सभा झाली. त्या सभेत बोलताना राहुल यांनी शक्तीविषयक वक्तव्य केले. त्यावरून भाजपने कॉंग्रेस आणि राहुल यांना घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यावरून जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला चढवला.
आता तो विषय आणखी पुढे नेत भाजपने थेट निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. राहुल यांचे वक्तव्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आहेत. हिंदूंमधील मोठा घटक देवीला शक्ती मानतो. त्यामुळे राहुल यांचे वक्तव्य द्वेष निर्माण करणारे असल्याचे भाजपने तक्रारीत म्हटले आहे.
राहुल यांनी त्यांचे वक्तव्य टीकेच्या केंद्रस्थानी आल्यानंतर याआधीच स्पष्टीकरण दिले. मी उल्लेख केलेली शक्ती धार्मिक नाही. ती अधर्म, भ्रष्टाचार आणि असत्याची शक्ती आहे, असे त्यांनी म्हटले होते.