नारायणगाव -अवकाळी पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला पिकांची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
माजी खासदार आढळराव पाटील यांनी 14 मे रोजी गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, करोनाच्या महाभयंकर परिस्थितीत शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन शेतीमाल पिकवत आहेत. त्यातच स्थलांतरणामुळे शेतमजुरांची संख्याही कमालीची घटली आहे.
त्यामुळे रात्रन्दिवस काबाड कष्ट करून शेती फुलविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तर आहेतच; पण आर्थिक दुर्बलताही तीव्र स्वरूपात दिसून येत आहे. यातच झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्षे, पपई, टोमॅटो, डाळिंब आदींसह भाजीपाला व कांदाचाळींसह पोल्ट्री शेडचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे 500 एकरहून अधिक शेतीची नासाडी झाल्याने या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. या परिस्थितीत ही आर्थिक हानी भरून काढणे येथील शेतकरी वर्गाला शक्य होणार नाही.
तालुक्यातील आर्थिक स्त्रोत शेती व पर्यटन यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव, वारूळवाडी, गणेशनगर, भोरवाडी, बेंदमळा, चौदा नंबर आदी गावांचे शेतीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे तात्काळ पाठवावा. आढळराव यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे याविषयीचा सविस्तर पाठपुरावा करून झालेल्या नुकसानीपोटी योग्य आर्थिक मोबदला मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाच या वादळी व गारपीट पावसाने शेतकरी अजून आर्थिक अडचणीत गेला आहे.