मावळ तालुका भाजप किसान मोर्चाची मागणी
सोमाटणे – मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकासह अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करावी. तसेच कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठीची मागणी मावळ तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार मावळ यांना केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले.
या वेळी मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर, सरचिटणीस रघुनाथ चोरघे, मनोहर भेगडे, शांताराम काजळे, रवींद्र घारे, बाळासाहेब जाधव, विलास दळवी, कचरू पारखी आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मागील दोन महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक ऐन काढणीच्या वेळेस भात खाचरात पाणी साचल्याने भातपिक आडवे झाले आहे.
अस्ताव्यस्त झाल्यामुळे भातपिकांचे व काढलेल्या भाताच्या पेंढ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागाला भेट दिली. तसेच या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत. शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शासनाला केली असल्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी दै. “प्रभात’शी बोलताना स्पष्ट केले.