पिंपरी – राजकीय दबावाखाली येऊन आयुक्तांनी कामे करू नयेत. महापालिकेत नवीन लोकप्रतिनिधी येत नाहीत तोपर्यंत आयुक्तच महापालिकेचे प्रमुख राहणार आहेत. राज्यकर्त्यांच्या दबावाखाली येऊन काम न करता ज्याचे परवडणारे दर आहेत, अशाच लोकांकडूनच विकासकामे करुन घेतली पाहिजेत, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह याना सुनावले.
पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथे खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत मी पिंपरी-चिंचवडचा चेहरामोरा बदलला, हे सर्वांना माहीत आहे. काम करत असताना कोणाच्याही बाबतीत मी भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक विकास केल्यामुळे शहराला बेस्ट सिटीचे पारितोषिक मिळाले. पालिकेतील पैसा हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या विकासासाठीच खर्च केला पाहिजे. शहरातील केबल नेटवर्कचे काम आयुक्तांनी गुन्हे दाखल
झालेल्या माजी संचालकांच्या कंपनीला सर्वांचा विरोध डावलून काम दिल्याचे समजले. हे अत्यंत विदारक चित्र असल्याचे पवार म्हणाले. महापालिकेतील पैशांचा चुकीच्या पद्धतीने उपयोग होत असल्यास शहराध्यक्ष अजित गव्हाणे वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात. आम्ही जे निदर्शनास आणून देत आहोत. हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे. कारण नसताना एक वर्षे महापालिका निवडणुका पुढे गेल्या आहेत. वास्तविक फेब्रुवारी 2022 मध्येच निवडणूक व्हायला पाहिजे होती. परंतु, ओबीसी घटकाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधीत्व मिळत नव्हते, म्हणून आम्ही न्यायालयात जाऊन ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी प्रयत्न केला. त्याचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत, असेही पवार यांनी म्हटले.