निवडणुकांच्या निकालांवेळी कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची त्रिशंकू स्थिती समोर येऊ लागल्यावर विविध पक्षांचे नेते एक समान प्रतिक्रिया हमखास देतात. ती म्हणजे ऑल ऑप्शन्स आर ओपन. अर्थात, सर्व पर्याय खुले आहेत. सध्या राज्याराज्यांमधील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय चित्र पाहता कुठला पक्ष कुणाशी युती, आघाडी करेल हे निष्णात ज्योतिषीही सांगू शकणार नाही.
महाराष्ट्रातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी नुकतेच भुवया उंचावणारे राजकीय गौप्यस्फोट केले. राज्यात 2014 मधील विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याचा विचार भाजपमधील एका गटाने मांडला. पण, तो विचार बाजूला पडून जुना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्यात आली. राष्ट्रवादीशी युती न करणे ही आमची चूक होती, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. तर, 2017 मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार स्थापण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, शिवसेनेशी जमणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादीने तो प्रस्ताव नाकारला, असा दावा शेलार यांनी केला. त्यातून राज्यात युती करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादी असा पर्याय भाजपने खुला ठेवल्याचे सूचित होते.
महाराष्ट्रात 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर भलतेच घडले. भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर सरकार स्थापनेविषयी बराच काळ सस्पेन्स निर्माण झाला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची चाचपणी करू लागले. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच एके दिवशी सकाळी अचानकपणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, पवार काही तासांतच पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या गोटात परतले. त्या तीन पक्षांनी महाविकास आघाडी बनवत सरकार स्थापन केले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचे फडणवीस यांचे स्वप्न भंगले.
राज्यातील सध्याच्या सरकारमुळे शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेना वर्ज्य नसल्याचे स्पष्ट झाले. देशात अनेक वर्षांपासून युत्या, आघाड्यांचे राजकारण रूजले आहे. प्रारंभी युती किंवा आघाडी करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येण्याला प्राधान्य द्यायचे. पण, आता सत्ता मिळवण्यासाठी पक्ष राजकीय अस्पृश्यता पाळत नसल्याचे दिसून येते. राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी, विकासासाठी एकत्र आलो, अशी गोंडस भूमिका राजकीय पक्ष एकत्र येण्यासाठी पुढे करतात. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे राजकीय शत्रू असणारे पक्ष कधी मित्र बनतील याचा नेम राहिलेला नाही. त्यातूनच राष्ट्रीय पातळीवरही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत (यूपीए) आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत (एनडीए) घटक पक्षांची ये-जा सुरू दिसते.
राजकीय मित्र बदलणारे अनेक नेते किंवा पक्ष देशात आहेत. त्यांची मोठी यादी होईल. तूर्त, उदाहरणादाखल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा विचार करू. ममता भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांमध्ये मंत्री होत्या. नितीश प्रदीर्घ काळ भाजपशी मैत्री ठेऊन आहेत. मात्र, काही काळ त्यांच्या जेडीयूने भाजपशी साथ सोडून राजद, कॉंग्रेससमवेत महाआघाडी स्थापन केली होती. मायावती वेगवेगळ्या वेळी समाजवादी पक्ष आणि भाजपच्या पाठिंब्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हेच खरे.